देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून पुन्हा असे धाडस कोणी करता कामा नये, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, प्रणील नायर, कचरू यादव, बब्बू खान, अजंता यादव, राजा रहेबर, अवनीश सिंग, क्लाइव्ह डायस, फकिरा उकांडे इत्यादी उपस्थित होते.
यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र व देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावर हल्ला होणे हे संतापजनक व चिंताजनक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाने पसरवलेल्या विषारी व विषारी विचाराची ही फळे आहेत. वकील हे संविधानाचे रक्षण करणारे सैनिक आहेत, एका वकिलाच्या या घृणास्पद कृत्याचे काही पत्रकार, मीडिया संस्था व सोशल मीडिया ट्रोलर्सनीही कौतुक केले हे आणखी चिंताजनक आहे. संविधान आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समावेशक भारताच्या दृष्टिकोनाचा हा उघड अवमान आहे, असल्याचा आरोप केला.
Marathi e-Batmya