अजित पवार यांची शेतकऱ्यांना गोड बातमी, वीस टक्के निर्यात शुल्क रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शाह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मानले आभार

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दि. १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या निर्णयाचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी मी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेबांसोबत थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.” असे आश्वासनही यावेळी दिले.

About Editor

Check Also

पालघर अपघात : मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत वितरित

पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *