महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही, ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात मागील काही काळात पुणे जिल्ह्यातील माळीण गाव,रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये व कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्यूमुखी पडल्यानंतरही सरकारने याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचा आरोपही यावेळी केला.
अंबादास दानवे म्हणाले की, दरडग्रस्त तळीये गावात दरड कोसळून ६६ लोकांचा मृत्यू झाला असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले होते. आतापर्यंत फक्त ६६ कुटुंबांना घरे मिळाली असून बाकीचे कुटुंब अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सदरील ठिकाणी अजूनही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी करत या पावसाळ्यात या दरडग्रस्त भागात अशाच काही घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत आज म.वि.प. नियम २८९ अन्वये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधान परिषद सभागृहात सूचना केली.
Marathi e-Batmya