विरोध असताना ओबीसी ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्याचा राग मनात धरून सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना भाजपा सदस्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची दुर्दैवी घटना घडली. झाल्याप्रकाराने विधानसभेचे कामकाज जवळपास १ तासासाठी तहकूब करावे लागले.
अखेर झाल्याप्रकारावर सभागृहातच चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात उपाध्यक्षांच्या दालनात झालेला प्रकार सांगताना म्हणाले की, सभागृहात ठराव मांडल्यानंतर मी उपाध्याक्षांच्या दालनात बसलो. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रागातच तेथे आले. तेथे आल्यानंतर त्यांना मी बसण्याची विनंती केली. त्यांच्यानंतर चंद्रकांत पाटील हे तेथे आले. त्यांनाही मी बसण्याची विनंती केली. मात्र ते माझ्याशी उभ्या उभ्याचे चर्चा करू लागले. त्यानंतर भाजपाचे काही सदस्य येवून मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करू लागले. तसेच मला धक्काबुकी करण्यास सुरुवात केली.
त्यावर उपाध्यक्षांनी मला दालनाच्या बाहेर जा अशी सूचना केली. मात्र मी कोठेही गेलो नाही. तसेच मी त्या सर्वांना म्हणालो आता तुम्ही सगळे आहात मी एकटा आहे. मी शांत माणूस नाही. त्यामुळे सांसदीय कार्यमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे दिसेल त्याची पहाणी करावी आणि त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देतो.
मी सांगतोय त्यात आणि त्या फुटेजमध्ये यात काही बदल असेल तर त्यानुसार मी होईल ती कारवाईस सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे रहात म्हणाले की, आपल्यासोबत सदरचा प्रकार झालेला नाही. झाला प्रकार हा भाजपाचे सदस्य आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये झाला आहे. तसेच मी स्वतः भाजपाच्या सदस्यांना दालनाबाहेर काढले. तसेच झाल्याप्रकराबद्दल माफी मागितली. त्यामुळे याप्रश्नावर कोणताही निर्णय घेण्याऐवजी चर्चा बोलवा आणि त्यातून मार्ग काढू अशी विनंती केली.
त्यावर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले की, आपण माफी मागितल्याचे मला माहीत नाही. मात्र झाल्याप्रकरानंतर आशिष शेलार माझ्या कोकणातले मित्र त्यांनी चार-पाचवेळा माफी मागितली. मी कधीही खोटे बोलत नाही आणि शब्द फिरवत नाही. त्यामुळे जे सीसीटीव्हीत दिसेल त्यानुसार कारवाई करा अशी सूचना केली.
त्यानंतर सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांच्यासोबत केलेला व्यवहार योग्य नसल्याने डॉ.संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यु काळे, जयकुमार रावल, पराग आळवणी, गिरीष महाजन, राम सातपुते, योगेश सागर, अतुल भातखळकर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडीया, शिरीष पिंपळे या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करत असल्याचे जाहीर केले.
परब यांच्या निर्णयानंतर फडणवीस म्हणाले की, विरोधकांची संख्या कमी करण्याचा हा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप केला आणि सरकारच्या या निर्णयामुळे सभात्याग करत असल्याचे सांगत बाहेर पडले.
Marathi e-Batmya