चीनने घुसखोरी करुन भारताचा भूभाग बळकावला की नाही याची माहिती द्या चीनला लाल डोळे करुन दाखवण्याची हिच योग्य वेळ : सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी
चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे ? हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.
चीनने लडाखच्या भागात तीन ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या बातम्या येत असून ही चिंतेची बाब आहे. परंतु सरकारने अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. चीनने सीमेवर आगळीक केली आहे की नाही याची माहिती मोदी सरकारने जनतेला द्यावी ही काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची मागणी योग्यच असून सरकारने वस्तुस्थिती सांगावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या विषयावर जाहीर वक्तव्य करतात पण आता अचानक शांत का आहेत? ही शांतता कानठळ्या बसवणारी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेरोशायरी केली पण राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले.
चीनने भारताच्या ६० किमी आत प्रवेश केल्याच्या बातम्या असून लडाखमधील पेंगांग लेक, गलवान रिव्हर व्हॅली व हॉट स्प्रिंग कोंका पास या भागात चीनी सैन्याने अतिक्रमण केल्याच्या बातम्या येत आहेत. ग्लोबल टाईम्स या चीनी माध्यमाने चीन यावेळी फार तयारीने आला आहे असे व्हिडिओ द्वारे जगाला सांगितले आहे. मोदीजींनी अनेकदा चीनवर लाल डोळे करुन कठोर कारवाई केली पाहिजे असे म्हटले होते. परंतु आता मात्र वेगवेगळ्या स्तरावर चीनशी चर्चा सुरू आहेत असे दिसते.
चीनने भारताचा भूभाग बळकावला असेल तर मोदी सरकारने चीनवर कठोर कारवाई केल्यास काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असेल. जग कोरोनाशी झुंजत असताना चीन ची ही घुसखोरी कदापि सहन करता कामा नये अशी सूचना त्यांनी केली.

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *