मुंबई: प्रतिनिधी
घटनात्मक महत्त्वाचे पद असणाऱ्या महामहिम राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा खडा सवाल भाजप नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना करत राजभवनाच्या मदतीला धावले.
राज्यपालांवर खा. संजय राऊत यांनी टीका केली होती त्याला आमदार अँड आशिष शेलार यांची जोरदार प्रतिउत्तर देत म्हणाले की, राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे…काय होतं ते ? तुम्ही जेव्हा दोन नावे मित्र पक्षाची सूचविली त्यावेळी मा. मुख्यमंत्र्यांचे नाव राज्यपालांना का सुचवले नाही?. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत मा. मुख्यमंत्र्यांना का उमेदवारी दिली गेली नाही? आपण हे विसरलो…हे आता सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचा आहे? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते..समजनेवाले को इशारा काफी है.. असा खोचक टीकाही त्यांनी केली.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील…दबाव कशाला आणत आहात? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा…पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला आता शिमगा आहे का? असा उपरोधिकत सवालही त्यांनी केला आहे.
Marathi e-Batmya