अजित पवारांनी दिला इशारा, पुण्यातील शाळा बंद- राज्यासाठी नवे निर्बंध सकाळी जाहिर वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येवरून अजित पवारांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम
आगामी २०-२५ दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील संभावित संख्या वाढीला नियंत्रणात आणण्याच्यादृष्टीने उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात कोरोनाशी संबधित गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे हे ही उपस्थित होते.
पुण्यातील रूग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील १ ली ते ८ वीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आले आहे. याशिवाय पुण्यात विना मास्क आढळून आल्यास त्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे तर रस्त्यावर थुंकल्यास १ हजार रूपयांचा दंड आकरण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जर १० टक्के पेक्षा जास्त संख्या असेल तर कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. मात्र कालची संख्या पाहता १८ टक्के होती. त्यामुळे आता नव्याने निर्बंध जाहिर करण्याची गरज असल्याचे सांगत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबरील चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत यासंदर्भातील घोषणा सकाळी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या ओमायक्रॉनचा प्रसार १०८ देशामध्ये झालेला असून देशातील २३ राज्यात ओमायक्रॉनचा फैलाव झालेला आहे. तर महाराष्ट्रातील ११ शहरांमध्ये ओमायक्रॉन पसरलेला आहे. या विषाणूचा प्रसार वेगाने होत असून दर तीन दिवसाला तीन पटीत वाढ होत आहे. या संसर्गावरील ट्रिटमेंट प्रोटोकॉल अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र यासंदर्भात लवकरच तो तयार करून केंद्र सरकारकडून येईल असेही त्यांनी सांगितले.

सध्या मुंबईसह पुण्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रूग्णसंख्येत माेठ्य़ा प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे आणखी परिस्थिती चिघळू नये या उद्देशाने पुणे आणि राज्यात काय निर्बंध जाहीर करावे लागतील याची चाचपणी करण्यात आली आहे. पुणे येथे निर्बंध आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांची खैरात वाटणाऱ्यांना बडतर्फ करा शासकीय दुखवटा असतानाही प्रमाणपत्र वाटण्याची घाई कशासाठी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालेल्या दिवशीच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी शैक्षणिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *