एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहपूरमधील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन चाललोय. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी व ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाले. आताही महायुतीची दुसरी इनिंग सुरु आहे, देवेंद्रजी आणि आमची टीम महाराष्ट्राला पुढे नेतेय. या राज्याचा विकास, प्रगती झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, या हेतूने सरकार काम करत आहे, असल्याचे सांगितले.
माजी आमदार भानुदास मुरकुटे, नीरज मुरकुटे, संजय छल्लारे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेकडो सहकारी, अनेक माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिप सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विदर्भ शिक्षक संघटनेचे डॉ. दिलीप सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे आणि प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात शहापूर तालुक्यातील उबाठा गटाच्या जवळपास ७०० कार्यकर्त्यांनी आज धनुष्यबाण हाती घेतला. तसेच लातूरमधील महिला भगिनींनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
उच्चशिक्षित तरुण राजकारणात येणं ही काळाची गरज
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण हाती घेणाऱ्या भानुदास मुरकुटे यांचा नातू नीरज मुरकुटे याचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले. नीरज मुरकुटे हा ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आला आहे. त्याने शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समाजाच्या दृष्टीने उच्चशिक्षित पिढी राजकारणात येणं, ही काळाजी गरज आहे, असे सांगत पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील नुकताच चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. श्रीकांत यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाचे यशस्वी नेतृत्व केलं आणि परदेशात ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका पटवून दिली. या चारही देशांनी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा करण्याचे काम या शिष्टमंडळाने केले असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya