महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसंदर्भात चर्चा केली हे अत्यंत संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे, अन्यथा तेथेच थांबावे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा नळकुंड, व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी या गावांमध्ये अतिवृष्ठी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धीरज लिंगाडे होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागत म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी २ लाख रुपये द्यावेत, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी ३ हजार रुपयेही पदरात पडणार नाहीत. काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. आता पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले..
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही. या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत, अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही करताना, ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का? असा सवाल केला.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणालातरी वादग्रस्त वक्तव्य करायला लावून ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता भिडेंचे किडे वळवळले असून हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असू शकतो. पण भिडे हिजडे कोणाला म्हणाले. दांडिया खेळणारे तर हिंदूच आहेत, त्यांनाच भिडेंनी हांडगे म्हटले आहे का? असा प्रतिप्रश्न केला.
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कल्याण मधील ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून अशोभनीय कृत्य केले आहे. हे गुंड भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातीलच आहेत यावरून भाजपाची संस्कृती काय आहे हे स्पष्ट होते. या गुंडांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेस पक्ष पगारे या कार्यकर्त्याच्या पाठीशी असून त्यांचा लवकरच मोठा गौरवही केला जाणार असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya