शरद पवार म्हणाले, पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रु नाहीत

मागील काही वर्षात पाकिस्तानचा बागुलबुवा करून देशातील काही राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर राजकारण करत निवडणूका जिंकल्या. तसेच देशातील मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दाही उपस्थित करण्यात येतो. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले असून पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रु नसल्याचे वक्तव्य करत तेथे आपले बांधव राहतात. ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेवून सत्ता काबिज करायची आहे त्यांनाच दोन्ही देशांमध्ये तणाव हवा असतो असे सांगत एकच खळबळ उडवून दिली.
शरद पवार हे पुण्यातील कोंढवा परिसरात ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.
सध्या जगात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियासारखा शक्तीशाली देश युक्रेनसारख्या लहान देशावर आक्रमण करत आहे. तर श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरून लढत आहेत आणि तेथील नेते भूमिगत झालेत. शेजारी पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात तेथे एक तरुण पंतप्रधान झाला, त्याने देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला सत्तेतून बाहेर काढण्यात आलं. आता पाकिस्तानमध्ये वेगळं चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाहोर असो की कराची आम्ही पाकिस्तानमध्ये जेथे गेलो तेथे आमचं यथोचित स्वागत झाले. आम्ही आपल्या क्रिकेट संघासोबत कराचीला गेलो होतो. सामन्यानंतर खेळाडूंनी आजूबाजूची ठिकाणं पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आम्ही नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मात्र, रेस्टॉरंट मालकाने आम्ही त्यांचे पाहुणे असल्याचं सांगत आमच्याकडून पैसे घेण्यास नकार दिल्याची आठवण त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली.
पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत. ज्यांना पाकिस्तानच्या सैन्याचा वापर करून सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट करत ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले कारण स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांमध्ये एकी होती. त्यामुळे आज जर कोणी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास लोकांनी एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे असे आवाहन करत मनसे आणि भाजपाला इशारा दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड सार्वजनिक आणि खाजगी भागिदारीतून रूग्णालयाची उभारणी

पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *