नवी मुंबईः प्रतिनिधी
राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना मनसेकडून १४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून केली. मात्र या स्थापनेच्यावेळीच सरकारच्या निर्णयाची माहीती घेताना ब्लॅकमेलिंगसाठी शॅडो कॅबिनेटमधील सदस्यांनी आरटीआयचा वापर करू नये असा सज्ज़ दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.
नवी मुंबई येथे पक्षाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेटमध्ये गृह खात्याची जबाबदारी बाळा नांदगांवकर यांच्याकडे तर मराठी भाषेची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे सोपविली.
राजकारणात चढ-उतार येत असतात. आज अनेक राज्यात भाजपला धक्का बसला आहे. काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. हे प्रकार होत असतात. जेंव्हा देशात लाट असते तेंव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी पण मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? अशी उपरोधिक विचारणा त्यांनी प्रसारमाध्यमांना केली.
शॅडो कॅबिनेटमधून चांगलं काम केलं तर सरकारचे कौतुक करु चुका केल्या तर त्याचे वाभाडे काढू असा इशारा देत ब्लॅकमेलिंगसाठी आरटीआयचा वापर करू नका असा इशाराही त्यांनी मनसैनिकांना दिला.
कामं केली तरी मतदानावेळी लोक त्याचा विचार करत नाहीत.
गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही असा सवाल करून लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केला.
इतक्या चढ उतारानंर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला आनंद झाला असल्याची भावना व्यक्त करून ते म्हणाले की, या शॅडो कॅबिनेटमध्ये आणखी कुणाला काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी सांगाव त्यांचाही यामध्ये समावेश केला जाईल.
Marathi e-Batmya