मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही वाद, भांडणं किरकोळ आहेत, तसेच एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार काही कठिण नाही. फक्त प्रश्न आहे तो इच्छेचा असे वक्तव्य करत ठाकरे बंधू एकत्र येण्याचे राजकिय संकेत दिले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबरील किरकोळ भांडणे मिटवायला तयार असल्याचे सांगत काही अटी व शर्थींच्या आधारे आपणही भांडणं, वाद मिटवायला तयार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना उबाठाची पुढील सावध भूमिका स्पष्ट केली.
संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, इकडे ही ठाकरे, तिकडेही ठाकरे आहेत. त्यामुळे आम्ही सध्या सकारात्मक आहोत. वैयक्तीक स्तरावर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे बंधू असले तरी त्यांच्यातील नात्याचे संबध कायम आहेत, जो काही फरक आहे तो राजकीय विचारांचा आहे. राज ठाकरे हे माझेही वैयक्तिक मित्र आहेत. त्यामुळे आमच्यात आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात नेहमी संवाद होत असतो असेही यावेळी सांगत उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता मनसे पुढे काय भूमिका मांडतो याबाबत आम्ही सकारात्मक भूमिकेतून पहात आहोत असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोघेही ठाकरे आहेत. त्यांच्यातील नातं कायम आहे, काही राजकिय मतभेद निर्माण झाल्याने दोन मार्ग तयार झाले आहेत. तरीही उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा राहिला आहे. तसेच राज ठाकरे याचं विधान आपण ऐकलं आहे, तसेच राज ठाकरे यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्र हितासाठी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहेत. त्यावर उद्धव ठाकरे याचं म्हणण आहे की, कोणतंही भांडण नाही किंवा वाद नाही, जरी वाद असले तरी ते मिटवायला वेळ लागत नाही. मात्र भूमिका ऐवढीच आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या वेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते असेही यावेळी सांगितले.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या ज्या फौजा आहेत, त्यांच्याशी आपण संबध ठेवाता कामा नये, आता आमची भाजपाशी २५ वर्षे युती होती. त्यातील काही काळ राज ठाकरे हे शिवसेनेत असतानाही ते देखील सहभागी होते, पण जेव्हा शिवसेनेवर घाव घालण्याचं काम झालं तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं. आता लोकसभा निवडणूकीत आमची भूमिका काय होती की, महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की अशा काही शक्ती आहेत त्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात, मराठी माणसांच नुकसान व्हावं यासाठी ते कारस्थान करतात, त्यांच्या पंक्तीला आम्ही बसणार नाही, अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अशी भूमिका कोणी घेत असेल तर स्वागत आहे, त्यानंतर आम्ही पुढील प्रतिक्रिया सांगू असेही यावेळी स्पष्ट केले.
पुढे संजय राऊत यांनी भाजपावर आरोप करताना म्हणाले की, भाजपाला ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. अशावेळी जर दोन्ही ठाकरेंनी साद-प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करेल. उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतिक्षा करणार आहोत, आम्ही नक्कीच सकारात्मक नजरेतून सगळ्या गोष्टींकडे पहात आहोत, शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya