मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (३९) यांनी जामीनासाठी उच्च न्यायासयात धाव घेतली आहे.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांस्य पुतळा पडल्याचा दावा आपटे यांनी याचिकेतून केला असून याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
गेल्यावर्षी ४ डिसेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. दोन कोटी ४४ लाख रुपयांचे खर्चुन हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, २६ ऑगस्ट रोजी हा उभारलेला पुतळा अचानक कोसळला.
भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आपटे यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला, आपटे यांनी ओरोस येथील सत्र न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज १ ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आला. त्यानंतर आपटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकला डिप्लोमा प्राप्त असलेले शिल्पकार आपटे यांनी ८ सप्टेंबर २०२३ रोजी नेव्हल डॉकयार्डने काढलेल्या आदेशानुसार कांस्य पुतळ्याची निर्मीती केली होती. नौदल डॉकयार्ड प्राधिकरणाने कोणत्याही कलात्मक कमतरतांबद्दल कधीही तक्रार केली नसल्याचा दावा आपटे यांनी याचिकेत केला आहे. दुसरीकडे, ज्यांना धातू शास्त्रामध्ये तांत्रिक कौशल्य नाही अशा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पुतळा कोसळल्याच्या नऊ तासांच्या आत गुन्हा नोंदवला. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचा तक्ररीत नमूद केलेले नाही. जास्तीत जास्त, हे निष्काळजीपणाचे प्रकरण असू शकते, असा दावाही याचिकेत केला आहे. तर याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. चेतन पाटील यांच्यावर पदपथ उभारणी आणि स्थिरता विश्लेषणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. २० ऑगस्ट रोजी तपासणी दरम्यान, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना पदपथ उभारणीसाठी वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले असल्याचे आढळून आले होते.
उभारण्यात आलेला पुतळा अनेक शतके टिकेल त्यासोबतच सुस्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय केले जात असल्याचेही आपटे यांनी जामीन याचिकेत म्हटले आहे.
Marathi e-Batmya