शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका

खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

अजित पवार यांनी सादर केलेल्या १० व्या अर्थसंकल्पावरून शरद पवार म्हणाले की, एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च असेल आणि माझ्या खिशात ७० रुपये असेल तर मग खर्च कसा करणार असा सवाल करत तुमच्याकडे महसूली जमा किती आहे. महसूली खर्च किती होणार आहे, जरुरीपेक्षा जास्त खर्चाचा गॅप कसा भरणार हे न सांगता आम्ही करु या म्हणण्याला फारसा काही अर्थ उरत नाही. एकंदरीतच हा अर्थसंकल्प विधानसभेच्या तोंडावर केलेला हा शब्दांचा फुलोरा असल्याची खोचक टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, महसूल तूट, एकंदर लागणारी आवश्यकता, या तीन गोष्टींची आकडे बघितले तर अपेक्षापेक्षा किती तरी कमी तरतूद असल्याचे दिसून येते. एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना काही तरी भयंकर करतो हे दाखविण्याचा प्रकार आहे. माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी मांडण्यात आल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कितपत होईल, याबाबत शंका असल्याची प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त केली.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, अर्थसंकल्पातील बाबी आधीबाहेर येता कामा नयेत त्याला अर्थसंकल्प फुटला असे म्हणतात. त्यांनी काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती. या अर्थसंकल्पातील अनेक महत्वाच्या गोष्टी बजेट मांडण्याआधीच बाहेर आल्या होत्या. याचाच अर्थ असा की अर्थसंकल्पाची गुप्तता पाळण्यात आली नसल्याच्या प्रश्नावर बोट ठेवले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आता राज्यात पुढील तीन महिन्यातच निवडणुका होणार आहेत या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्प मांडण्यात आला. तसेच ज्या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत त्या गोष्टी या बजेटमध्ये सांगण्यात आल्या आहेत. जमा, महसुली तूट आणि निधीची आवश्यकता याचा विचार केला तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. माझी खात्री आहे की लोकांचा या अर्थसंकल्पावर विश्वास बसणार नाही, असेही स्पष्ट केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही चित्र असेल. आमच्या आघाडीत सामूहिक नेतृत्व असेल. लोकसभा निवडणुकीत आम्ही ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात १८ सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या १४ ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदीच्या कामावर जनता खुश नाही, असेही सांगितले.

संसदेतील आणीबाणीच्या मुद्यावर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांच्या भाषणातील तो भाग त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता. आणीबाणीचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्या विषयाला आता ५० वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी यांनी त्याविषयी दिलगीरीही व्यक्त केली होती. तो विषय काढणे योग्य नव्हते, अशी भूमिकाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *