शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकार सांगत होतं दहशतवाद संपवला पण पहलगाम हल्ला… पहलगाममधील हल्ला देशविरोधी, त्यावर राजकारण नको

केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काही चिंता नाही, पण जम्मू कश्मीर मधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही या प्रकरणात सरकारसोबत आहोत. पण, हा हल्ला सरकारने अधिक गांभीर्याने घेतला पाहिजे. गेले काही दिवस सरकारकडून सांगितलं गेलंय की, दहशतवाद आम्ही संपलला. आता काही चिंता नाही. दहशतवाद कमी होत असेल तर चांगलचं आहे. मात्र, पहलगामध्ये घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, सरकार कमी पडतय, हे समोर आलं. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. देशावर हल्ला होत असेल आणि सरकार गांभीर्याने घेत असेल तर ही कमतरता दूर करण्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहिजेत असेही यावेळी सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरुद्ध असं कोणी निर्णय घेते तिथं राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या असेही सांगितले.

शरद पवार म्हणाले की, इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. आपण काळजी घ्यायला पाहिजे, पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथं जी लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, काश्मीरच्या लोकांचे चरितार्थ हे पर्यटनावर आहे. लोक काही दिवस काश्मीरला जाणार नाहीत असेच दिसते. त्यामुळे काश्मीरच्या जनतेचं मोठे नुकसान होईल. पण एक जमेची बाजू घडली आहे, ज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले, असे आवर्जून सांगितले.

About Editor

Check Also

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *