शिवसेना नेते रामदास कदम यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी
आगामी निवडणूकीसाठी भाजप-शिवसेने दरम्यान युती होताना शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावानुसार युती झाली आहे. या प्रस्तावानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दोघांना भुषविता येणार आहे. तरीही भाजपमधील नेत्यांना या गोष्टीची मान्यता नसेल तर त्यांनी युती बिनधास्त तोडावी अशा इशारा शिवसेनेचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला.
राज्याच्या मुख्यमंत्री पदी ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा व्यक्ती मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचा खरपूस समाचार घेताना कदम म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी युतीत मिठाचा खडा टाकू नये. सेनेच्या प्रस्तावानुसार अडीच-अडीच वर्षाचे मुख्यमंत्री दोन्ही पक्षांना मिळणार आहे. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी स्वतंत्रपणे पत्रकार परिषदेत घ्यावी असे आवाहनही केले.
कोकणातील नाणार प्रकल्पासाठीच्या जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोकणातील नाणारच नव्हे तर इतर कोठेही ऑईल रिफायनरीचा प्रकल्प होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya