सुनेत्रा अजित पवार यांची माहिती, अहिल्यादेवीचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक...

स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या.

अखंड भारताच्या कल्याणाचा ध्यास घेणाऱ्या, न्याय, त्याग आणि कर्तृत्वाचे प्रतीक असणाऱ्या, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी आज सुनेत्रा अजित पवार या नतमस्तक झाल्या.

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या उपस्थित राहिल्या.

सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. त्यांनी आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करताना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या असेही सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या स्वतः चौंडीला आल्या होत्या. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करण्याचा योग आला त्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त ‘गोदावरी ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रे’चा भव्य शुभारंभही नुकताच करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शेवटी बोलताना सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे नाव देण्यात आले आहे. आदरणीय अजितदादांच्या प्रयत्नाने बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाले आहे. या महाविद्यालय आणि रुग्णालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. चौंडी येथील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने राज्याचा विकास शिंदे यांच्या हस्ते 'धनगररत्न' पुरस्कारांचे वितरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *