मुंबईः प्रतिनिधी
निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा लपवल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात सिध्द झाले असून याप्रकरणी खटला चालविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हयाची माहिती लपवल्याचे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले. माहिती लपवणे योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून या निर्णयाचे नवाब मलिक यांनी स्वागत केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्याचा मुख्यमंत्री स्वतः च्या गुन्हयाची माहिती लपवत असेल तर त्यांना राजकारणात राहण्याचाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक लढण्यास बंदी आणावी अशी मागणीही त्यांनी केली.
Marathi e-Batmya