ते २० हजार कोटी आणि खासदारकी रद्द, राहुल गांधी यांचा नेमका निशाणा कोणावर ? मी प्रश्न विचारणे थांबविणार नाही

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर काल राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. दरम्यान, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पाहिल्यांदाच नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करताना म्हणाले, अदानी आणि मोदींच्या संबंधावर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला.

यावेळी पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, देशात आज लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची उदाहरणं रोज बघायला मिळतात. मी संसदेत मोदी आणि अदानींच्या संबंधावर प्रश्न विचारले होते. त्याचे पुरावेदेखील सादर केले होते. अदानींच्या कंपनींमध्ये २० हजार कोटी कोणी गुंतवले? असा थेट प्रश्न मी विचारला होता, त्यामुळे माझी खासदारकी रद्द करण्यात आली, असा आरोपही केला. तसेच माझी खासदारकी रद्द झाली, तरी मी गप्प बसणार नाही. मी मोदी सरकारला प्रश्न विचारणं बंद करणार नाही. मी त्यांना घाबरत नाही, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना, देशाच्या लोकशाहीचं, देशातील संस्थांचं रक्षण करणे, देशातील गरीब लोकांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवणं आणि पंतप्रधानांशी असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेणाऱ्या अदानींसारख्या लोकांबद्दल सत्य बोलणं हे माझे काम आहे. मी मोदी सरकारच्या धमक्यांना आणि आरोपांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रियाही राहुल गांधी यांनी दिली.

राहुल गांधी यांनी मोदींना चोर म्हणून ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. या आरोपांना राहुल गांधी प्रत्युत्तर देताना म्हणाले, मी भारत जोडो यात्रेदरम्यान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चाललो. माझ्या यात्रेत सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदानी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजपा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्न विचारणं बंद करणार नाही, असा इशाराही दिला.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांचे आवाहन, ईकेवायसीच्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *