राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत आणि लोकसभा निवडणूकी दरम्यान भाजपाप्रणित महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीपासून लांब राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य करत सत्ता स्थापन करू शकणाऱ्या सोबत राहणार असल्याचे जाहिर केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच जागा वाटपाच्या फेऱ्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झाल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे कारण पुढे करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता संपुष्टात आणली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठीही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून चर्चेचे प्रस्ताव येण्याआधीच वंचित एकला चलो रे ची भूमिका घेत जवळपास २८८ जागांवर सर्वात आधी उमेदवार जाहिर करत त्यांच्या प्रचारालाही सुरुवात केली.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचितचे ५० ते ६० उमेदवार विजयी होतील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांनासोबत राहु असे वक्तव्य करत निवडणूकीनंतर महाविकास आघाडी आणि महायुतीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. यासदंर्भात प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर ट्विट करत तयारी दर्शविली आहे.
ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे जाहिर केले.
पुढे आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, शनिवारी (दि.२३) राज्यात मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या वेळी अनेक ठिकाणी जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तेत जाणार असल्याचे सूतोवाच केले.
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 22, 2024
Marathi e-Batmya