ठाणे : प्रतिनिधी
व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे २१ राजकिय पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती.
व्हीव्हीपॅटचा आलेला निर्णय हा अत्यंत दुर्देवी आहे. जर, व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करायची नसेल तर ते लावलेच कशाला? ईव्हीएमवरील असलेले शंकेचे निरसण करण्यासाठी व्हीव्हीपॅटचे आगमन झाले. जर, व्हीव्हीपॅटची मतमोजणीच होत नसेल तर संशयाला अजून जागा मिळते. व्हीव्हीपॅटची मतमोजणी झालीच पाहिजे. ईव्हीएम मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. जगातून ईव्हीएम हद्दपार झाले. ते फक्त आपल्या देशामध्ये ठेवण्यात आलेले आहे. कारण ते मॅनेज होतंय! म्हणून व्हीव्हीपॅटबाबत आग्रही झाले पाहिजे. ५० टक्के नव्हे १०० टक्के व्हीव्हीपॅट मोजले गेलेच पाहिजेत. आमचं मतदान पेटीत कसे पडलेय ते आम्हाला कळलेच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
Marathi e-Batmya