अजित पवार म्हणाले, उदय सामंतांनी लावलेल्या झाडापेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रिडा संकुलाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणखी कुणी येईल, परवा कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत कामं करत राहणार. येताना विद्यापीठात एका बाजूचे लाईट सुरु होते. जरा विजेची बचत करा. मी लावलेल्या झाडाची पाहणी अधूनमधून करणार, खतपाणी घालून उदय सामंत यांनी लावलेल्या झाडापेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार असे सांगताच उपस्थितांमध्ये एक हलकेशी हास्याची लकेर उमटली. यावेळी विद्यापीठातील विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधीही त्यांनी यावेळी जाहीर केला.

अजित पवार यांनी पुणे विद्यापीठ निवडणुकीत आपल्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं, पण तरीही मला विद्यापीठात येता आलं नाही, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या मुद्द्यावरही भाष्य करत सावित्रीबाईंचा पुतळा विद्यापीठात नाही हे मनाला वेदना देत होतं, असं नमूद केलं.

अजित पवार म्हणाले, मी मागे देखील पुण्याचा पालकमंत्री होतो. उदय सामंत यांना माझा स्वभाव माहिती आहे. त्यांना मी माझ्या पक्षाच्या युवक आघाडीचा अध्यक्ष केलं होतं. तेव्हा त्यांनी माझं काम पाहिलं आहे. काम करत असताना कुणी आपल्याला बोलावत नाही आणि आपण म्हणायचं चला चला तिकडं जाऊ, चला चला इकडं जाऊ असा माझा स्वभाव नाही. जर कुणी बोलावलं तर गेलं पाहिजे. तिथे पण मानपान काही ठेवायचं कारण नाही. तिथे सगळ्यांना मदत झाली पाहिजे असेही ते म्हणाले.

आत्ताच्या काळात उदय सामंत यांनी मला आग्रह केला म्हणून मी विद्यापीठ परिसरात आलो. मी या ठिकाणाहून अनेकदा जात येत असतो. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवायचा होता आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी हवी होती. तसेच इतर काही कामं होती. मी पाच मिनिटात त्यांचं काम केलं. कामासाठी मला वेळ लागत नाही. सावित्रीबाई फुले यांचं या विद्यापीठाला नाव आहे आणि त्यांचाच पुतळा विद्यापीठात नाही हे मनाला वेदना देत होतं अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विद्यापीठात निवडणूक होते आणि त्यात सुदैवाने माझ्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं आहे. म्हणजे माझी बायको इथं आहे आणि तरीही मला विद्यापीठात येता आलं नाही. आता काय म्हणायचं? ही माझी अवस्था आहे अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *