उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला ‘हे’ खासदार उपस्थित जवळपास १० आमदार राहिले गैरहजर

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती निवडणूकीतील भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले. त्यानंतर दिल्लीतील खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला १८ खासदारांपैकी तब्बल १० खासदार गैरहजर राहिल्याचे दिसून आले आहे. तर फक्त ९ खासदार उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला हजर राहिल्याचे माहिती पुढे आली आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली. मात्र, या बैठकीत केवळ ९ ते १० खासदारांचीच उपस्थिती असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवेसेनेत मोठी फूट पडली होती. अखेर अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करुन सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली ही बैठक महत्वाची मानली जात होती.

उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला गजानन कीर्तिकर (मुंबई नॉर्थ वेस्ट), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), विनायक राऊत (रत्नागिरी- सिंधुदुर्ग), धैर्यशील माने (हातकणंगले), हेमंत गोडसे (नाशिक), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), श्रीरंग बारणे (पिंपरी चिंचवड) प्रताप जाधव (बुलढाणा), सदशिव लोखंडे (शिर्डी) आदी उपस्थित होते.

तर गैरहजर राहिलेल्यामध्ये कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली), राजन विचारे (ठाणे), कृपाल तुमाने (रामटेक), श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मांडलिक (कोल्हापूर), हेमंत जाधव (परभणी), राजेंद्र गावित (पालघर), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) यांचा समावेश आहे.

यापूर्वी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र यापूर्वी शिवसेनेने एनडीएशी संबंध तोडून काँग्रेस नेते प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपाशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत युपीएच्या यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यायचा की भाजपाच्या द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. येत्या एक दोन दिवसात उध्दव ठाकरे हे आपला निर्णय जाहिर करतील अशी माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिली.

तर याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, काही खासदार त्यांच्या कामानिमित्त येवू शकले नाहीत. तर काही जणांशी संपर्क होवू शकला नाही. पाठिंबा कोणाला द्यायचा याचा निर्णय उध्दव ठाकरे हे जाहिर करतील असे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *