आदित्य ठाकरेंची टीका, कितीही नेते येऊ दे गल्लीगल्लीत फिरायला लावणार वरळीतील शिंदे-फडणवीसांच्या सत्कारावरून साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ७ फेब्रुवारी रोजी वरळीत जाहिर सत्कार होणार आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. कितीही नेते येऊ दे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. पाठीवर वार करुन विरोधी पक्षात बसवण्यात आलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं, तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले, मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांमध्ये जाता येत नाही. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात, तेव्हा खोके वाटले जातात. पण, तरीही खुर्च्या रिकाम्या असतात, असा खोचक टोलाही लगावला.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, दुःख याचं नाही की उद्योग बाहेर गेले; मात्र राजकीय अस्थिरतेमुळे रोजगार येत नाहीत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. सध्या राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण बदलायचं आहे. जेव्हा तुम्ही मला भेटता बोलता, तेव्हा वाटतं की महाराष्ट्राला सुवर्णकाळ येईल; पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवला आहे, असल्याची खंत व्यक्त केली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *