जयंत पाटील फडणवीसांच्या त्या फोटोवर म्हणाले, धर्माला जास्त महत्व…मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने

अमेरिकेत कोणत्याही धर्माचा, जातीचा भेदभाव अजिबात नाही. त्यामुळे तो देश वेगाने प्रगती करु शकला. त्याच पध्दतीने भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत. मात्र आता अशा भूमिका भाजपाचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि ‘भारत हे हिंदू राष्ट्र होते हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहिल’ असलेले ट्वीट भाजपाच्या ट्वीटर पेजवर करण्यात आले आहे. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, जगात ज्यावेळी धर्माला जास्त महत्व दिले जाते त्यामध्ये विशेषतः सर्व मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांची फारशी प्रगती झालेली नाही. अमेरीका, इंग्लंडसारख्या राष्ट्रात गेलात तर सर्वांचे स्वागत होते आणि त्या देशांची प्रगती वेगाने झाली. त्यामुळे आपले हिंदू राष्ट्र आहे हे सांगण्याची, दाखवण्याची आवश्यकता नाही असा टोलाही फडणवीसांना लगावला.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, आपण बहुसंख्य हिंदू भारतात राहतो आणि भारताच्या सर्व व्यवस्थेवर हिंदू धर्मात असणार्‍या विद्वान लोकांचा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. पण आपलेच हिंदू अमेरिकेत जाऊन देखील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ झाले. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भारतीय हिंदू समाज हा गेलेला आहे याची आठवणही करुन दिली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात जो वाद सुरू आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यात न्यायाधीशांचे पॅनल होणार आहे किंवा आहेत ते दोन्ही राज्यांपेक्षा वेगळया राज्याचे असले पाहिजेत जे ऑब्जेक्टिव्ह विचार आणि त्यात भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून निर्णय देतील. त्यामुळे अजून एका न्यायाधीशांनी बॅकआऊट केले आहे तर अजून बराच काळ हे प्रकरण लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमा भागात असणाऱ्या मराठी माणसांना तातडीने न्याय मिळण्याची अपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, अजितदादांसंदर्भात जी काही चर्चा सुरू आहे त्यात तथ्य नाही. अजित पवार हे स्वतः च्या कामात गर्क असतील, त्यामुळे अशा कोणत्याही वावडयांना माझ्यादृष्टीने काही महत्व नाही असेही स्पष्ट केले.

कोणत्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी बाजू बदलली, कोणत्या कारणाने ते दुसरीकडे गेले हे सर्वश्रुत आणि सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी आज सांगितले की, देशातील लोकशाहीत विरोधकांना नमवण्याचे काम सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ शेतकऱ्यांच्या कृतज्ञता सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *