वंचित बहुजन आघाडी आणि बीआरएस या दोन पक्षात युती संदर्भात बोलणी सुरू असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी तेलंगणा आणि महाराष्ट्रात संभाव्य युतीसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा सुरू नाही. तसेच बीआरएस कडून तेलंगणा किंवा महाराष्ट्रात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता सिध्दार्थ मोकळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला.
यावेळी बोलताना सिध्दार्थ मोकळे म्हणाले, तेलंगणा सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
के.सी. राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारने राज्यातील प्रत्येक क्षेत्रात SC, ST, BC आणि अल्पसंख्याकांच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. संभाव्य राजकीय युतीसाठी बीआरएसने पुढाकार घेतल्यास, वंचित बहुजन आघाडी त्याबद्दल निश्चितपणे विचार करेल; बीारएसचा मताचा वाटा, लोकप्रियता आणि वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक अजेंडाला चालना देण्यासाठी बीआरएस काय करू शकते यासारखे अनेक घटक युती संदर्भात निर्णायक ठरतील. तेलंगणातील निवडणुकीत त्यांना मदत करण्यासाठी आमच्याकडे मतदारांचे संख्याबळ आहे पण बीआरएस हा वंचित बहुजन आघाडीसाठी महाराष्ट्रात किती उपयुक्त सहयोगी असू शकतो हा ही आमच्यासमोर प्रश्न आहे. मात्र बीआरएस कडून युती संदर्भात प्रस्ताव आल्यास नक्कीच वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल असेही मोकळे यांनी स्पष्ट केले.