Breaking News

त्या टीकेवर महेश तपासे म्हणाले, शरद पवारांवर टीका करणे ही राजकीय फॅशन पवार साहेबांनी मोठे केलेले लोक ऋण विसरले मात्र जनता पवार साहेबांसोबत

महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही याची खंत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलून दाखवली. राज्यातल्या नेते मंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले, पवार साहेबांच्या राजकीय विचारा विपरीत जाऊन काही नेते सरकारमध्ये समाविष्ट झाले व आता त्यांचं अंतर्मन त्यांना खात असल्यामुळे त्यांच्यावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली आहे असा टोलाही लगावला.

महेश तपासे म्हणाले, ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी मोठे केले ते सर्व नेते पवार साहेबांनाच विसरून सत्तेत मस्त झाले. आपली वैचारिक बांधिलकी धर्मनिरपेक्षते सोबत आहे याचा विसर काही नेत्यांना पडला आणि अनेकांनी व्यक्तिगत कारणामुळे भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी टीका करत शरद पवार देशातले एक वरिष्ठ नेते आहेत. ह्या नेतृत्वावर वेळोवेळी आरोप करून त्यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा डाव राज्यातच नव्हे तर देशपातळीवर अनेक वेळा झाला. पण आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे पवार साहेब कधी डगमगले नाही व सोडून गेलेल्या साथीदारांची फिकीर त्यांनी कधीच केली नाही त्या उलट प्रत्येक वेळेस नवीन नेतृत्व राज्यात उभा करण्याची कामगिरी पवार साहेबांनी केली याची आठवण तपासे यांनी यावेळी करून दिली.

महेश तपासे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाहीला व धर्मनिरपेक्षतेला घातक असलेल्या पक्षासोबत जाणार नाही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या भूमिकेवर संशय घेण्याचं कारण नाही. पक्षातील आमदार गेले तरीही पवार साहेबांनी भूमिका सोडली नाही व महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू ठेवले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार कधीही साहेब सोडणार नाही याची खात्री असल्यानेच आज जनता पवार साहेबांसोबत आहे असेही पुढे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच भाजपा व यांच्या मित्र पक्षाची डोकेदुखी वाढली असून पक्ष व नेते फोडण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.

नेत्यांनी कितीही विचारांसोबत फारकत घेतली तरीही कार्यकर्ता विचार सोडत नाही असा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे. २०२४ च्या निवडणुकीमध्ये देशातील तरुण पिढी ही मोदींच्या जुमल्यांना बळी पडणार नाही ही वस्तुस्थिती महेश तपासे यांनी अधोरेखित केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष जिल्हा प्रभारी यांची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक, आणि पक्ष संघटना बांधणी या संदर्भातील आढावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार असल्याची माहिती तपासे यांनी माध्यमांना दिली.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *