सुप्रिया सुळे यांचा आरोप, भारतीय जुमला पार्टी महाराष्ट्राच्या विरोधात

भाजपाने आईस (इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडी) चा केलेला गैरवापर. जे भ्रष्ट आहेत, त्यांच्या पार्टीचे आहेत, ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या विरोधात केला नाही. तर जे भ्रष्ट नाहीत, त्यांच्या विरोधात करतात आणि त्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवतात, हे आपण उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील सुडाचे राजकारण पाहत आहोत असा आरोप शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

कांदा प्रश्‍नाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने कांद्यावर जो टॅक्स लावला आहे, त्यामुळे कांद्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. हे जाणून मी सहा महिन्यांपूर्वी सातत्याने पियुष गोयल यांना ट्विट केले होते, की कांद्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. याबाबत आपण जातीने लक्ष घाला. देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती ३०-४० टॅक्स भरत नाहीत, मात्र माझ्या कष्ट करणार्‍या शेतकर्‍याला मात्र ४० टक्के टॅक्स भरावा लागतो, याचा मी जाहीर निषेध करते. मी पुढच्या आठवड्यात संसदेत हा प्रश्‍न उचलून धरणार आहे आणि त्याचा कडाडून विरोधही करणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही काल याबाबत विरोध प्रकट केला आहे. दुधाचीही परिस्थिती तशीच आहे. टँकर फोडले जात आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्‍नही उपस्थित केला.

इथेनॉलच्या प्रश्‍नाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काय गरज होती इथेनॉलचा निर्णय घेण्याची? त्यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचे पाप हे जुमला पार्टी सरकार करीत आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेशी आणि शेतकर्‍यांशी काहीही देणे-घेणे नाही. परवा संसदेतील प्रश्‍नोत्तराच्या तासाकडे जर पाहिले तर पियुष गोयल यांनी इथेनॉलचा सरकार काय-काय उपयोग करणार हे सांगितले आणि दुसर्‍याच दिवशी या जुमलेबाज सरकारने इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे भ्रष्ट सरकार आहे, हे सिद्ध होते, असा आरोपही केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर नवाब मलिक हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे वरीष्ठ नेते आहेत. ते उत्तम प्रवक्ता आहेत. त्याचबरोबर ड्रग्जचा पर्दाफाश करण्याचे काम त्यांनी केले. यानंतर महाराष्ट्रात ज्या ड्रग्जच्या घटना उघड झाल्या, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांनी ड्रग्ज माफियांचा पदार्फाश करणार आणि ड्रग्ज महाराष्ट्रातून हद्दपार करणार असल्याचे विधान केले होते. तेव्हा त्यांना फोन करुन ड्रग्जविरोधात खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आश्‍वासन मी दिले होते. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत चकार शब्द उच्चारलेला नाही. काही अटक झालेल्या आहेत. मात्र, त्यापुढे काहीही घडलेले नाही. त्यामुळे कदाचित त्यांना या डिलर्सना वाचवायचे असेल आणि ज्यांनी कदाचित एखादा फोन केला असेल, त्यांना तुम्ही फासावर चढवताय. नवाब मलिकांसारखे नेते जेव्हा महाराष्ट्रात ड्रग्ज विरोधात लढत होते. तोपर्यंत महाराष्ट्रात ड्रग्ज रोखण्यात यश येत होते. पण फडणवीसांना हे सगळे करायचे नसेल. त्यामुळे त्यांनी काल जो राष्ट्रवादीचा अपमान केला आहे, हे अतिशय दुर्दैवी असल्याची टीकाही केली.

फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्राविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही उपमुख्यमंत्री शेजारी-शेजारी बसतात. जर फडणवीसांना काही सांगायचे होते, तर त्यांनी शेजारीच सांगितले असते. अथवा ते पत्र पटलावर घ्यायचे होते, तर त्यांच्या हातात देवू शकत होते. हे पत्र ट्विट करुन माध्यमांसमोर आणण्याची काय गरज होती? कारण त्यांना राष्ट्रवादीचा जो छोटा गट तिकडे गेलाय, त्यांना लाजवायचे पाप ही जुमलाबाज पार्टी करीत आहे. याचबरोबर मित्रपक्षांचा मान-सन्मान ठेवणे तर सोडाच पण ही जुमला पार्टी या मित्र पक्षांना बरोबरीनेही घेत नाही, हेच यातून दिसून येते, असल्याचा आरोप केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *