भारतीय जनता पक्षाला माझे आव्हान आहे की, मी जी माहिती देत आहे ती खोटी आहे म्हणून सांगा. २०१४ ला भारतीय रेल्वे १०० % सरकारची आणि भारतीयांची होती. २०२४ मध्ये निवडणुका होत आहेत, या दहा वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेचे ७०% खासगीकरण झाले आहे, ३०% च सरकारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी घटना बदलू शकत नाहीत. बाबासाहेब १९५६ साली आमच्यातून निघून गेले. अजूनपर्यंत चमत्कार झालेला नाही की, गेलेला माणूस परत येतो. त्यामुळे बाबासाहेब परत येणार नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नका, मोदी तुम्ही सांगा की, तुम्ही घटना बदलणार आहे की नाही याचा खुलासा करा. बांधवांनो, तो खुलासा झाला नाही तर लक्षात ठेवा हे भाजपा-आरएसएस घटना बदलणार आहेत.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १५० वर्षांनंतर सुद्धा महात्मा फुले यांच्याबद्दल अपशब्द का बोलले जातात ? तर या देशाच्या विषमतावादी सामाजिक व्यवस्थेला महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरुंग लावला हे लक्षात घ्या. त्यांनी फक्त नुसता सामाजिक बदल केला नाही, तर इथल्या शेतकऱ्यांना जागृत करण्याचे कार्य सुद्धा केले आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितल्याचे अधोरेखित केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की, सरकारने जो इलेक्ट्रोल बाँड काढला आणि त्याच्यातून वीस हजार कोटी जमवले ही पद्धत घटनाबाह्य आहे. गावातील दादा जसा दुकानदाराकडून वसूली करतो. तशाच पद्धतीने यांनी सुद्धा वसुली केल्याचा आरोप करत राजकीय सार्वभौम टिकवून ठेवायचे असेल, तर आर्थिक कणा मजबूत असायला पाहिजे. आर्थिक कणाच कमकुवत असेल, तर आपल्याला नांगी टाकावी लागत असल्याचेही सांगितले.
Marathi e-Batmya