नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या गटाला एनडीएच्या मंत्रिमंडळात दोन जागा मिळणार आहेत. तर त्यापैकी एका मंत्री पदाच्या जागेसाठी प्रतापराव जाधव यांना देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फारच गुळमुळीत उत्तर दिले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात फोडाफोडी करत भाजपाने सत्तेत नवे भिडू मिळविले. मात्र लोकसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला ७ जागांवर विजय मिळवता आला. तर ज्या अजित पवार यांच्याकडून भाजपाला सर्वाधिक जागांची अपेक्षा होती. त्यापैकी फक्त एका जागेवरच त्यांचा उमेदवार निवडूण आला. तरीही अजित पवार गटाकडून केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या एकाची वर्णी लावावी अशी मागणी भाजपाकडे करण्यात आली. त्यावर भाजपानेही बघु, करू असे सांगत आज दिवसभर अजित पवार गटातील संबधित नेत्यांना फोनच केला नाही. मात्र अजित पवार गटानेही आता फोन येईल-मग फोन येईल असा दिलासा देत एकमेकांचे दिल्लीत सांत्वन केल्याचे बोलल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसऱ्याबाजूला केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी आयपीआयचे रामदास आठवले आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना फोनवरून निमंत्रणही दिले गेले. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्या गटाकडून आधीच प्रफुल पटेल यांचे नाव भाजपाला सांगण्यात आले होते. तसेच भाजपानेही अजित पवार गटाला स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र प्रफुल पटेल हे यापूर्वी मंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राज्यमंत्री म्हणून नियुक्त करणे योग्य होणार नसल्याने अजित पवार गटाने काही काळ थांबविण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिमंडळात समावेशाचा फोन गेला नसल्याचे स्पष्ट केले.