राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढवसानिमित्त आयोजित ‘जनविश्वास सप्ताहा’च्या माध्यमातून महायुती शासनाच्या लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहचवून “जनविश्वास सप्ताह” जोमाने व उत्साहाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला संपर्क कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित ‘जनविश्वास सप्ताहा’च्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, दत्तूपंत डुकरे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, मोहन शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्ये यावेळी आयोजित बैठकीला उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत आपण सर्वांनी आपल्या कणखर, गतिमान व प्रभावशील नेतृत्वाचा वाढदिवस “जनविश्वास सप्ताह” जोमाने व उत्साहाने साजरा करायचा आहे. अजित पवारांनी जो सर्वसामान्यांसाठी विकासाचा व सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे, त्याची जनजागृती करण्यासाठी मेळावे-सभा आयोजित करावेत. अर्थसंकल्पात जाहिर केलेल्या महत्वकांक्षी आणि क्रांतिकारी योजनांचा प्रसार-प्रचार करून त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी विशेष कार्यक्रम, मेळावे शिबिरे हाती घ्यावेत असे आवाहनही यावेळी केले.
पुढे बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, महायुती सरकारने महिलाशक्तीचा सन्मान म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (दरमहा १५०० रुपये), मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा, गृहिणींसाठी दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर, राज्यातील २५ लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बळीराजाला दिलासा देण्यासाठी ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, कापूस सोयाबीन प्रतिहेक्टर ५ हजारांचे अनुदान, कांदा ३५० रु/क्विंटल अनुदान, दूध ५ रुपयें/लिटर अनुदान, दुर्बल घटकांचा आधार देण्यासाठी संजय गांधी, श्रावणबाळ, निराधार, विधवा, दिव्यांग आणि वृद्धांना दरमहा १५०० अनुदान दिव्यांगांसाठी ३४,००० घरकुले, मौलाना आझाद महामंडळाला ५०० कोटींची हमी, ५ लाखापर्यंत आरोग्य विमा सरंक्षण रक्कम, वारकरी सन्मान करण्यासाठी, वारीचा जागतिक वारसा युनेस्कोकडे नामांकन प्रस्ताव, वारकरी संप्रदाय महामंडळ, दिंडींना प्रत्येकी २० हजार रुपये त्याचबरोबर किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन उत्सव, १२ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. शासनाच्या या लोककल्याणकारी योजना व महत्वपूर्ण निर्णय या ‘जनविश्वास सप्ताहा’च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवावी असे आवाहन यावेळी केले.