भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता ५ व्या क्रमांकावर असून या ५ वर्षात ४ थ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल; त्या पुढील ५ वर्षात ३ ऱ्या क्रमांकावर आणि त्या पुढील ५ वर्षांच्या काळात म्हणजे सन २०३९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर येऊन भारत राष्ट्र जगात जागतिक महासत्ता होईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
दुबई मधील बुर दुबई तील एम स्क्वेअर येथील हिल्टन डबल ट्री या हॉटेलमध्ये इंडियन बिझनेस अँड प्रोफेशनल काऊन्सिल तर्फे ग्रीन माईंड्स ही प्रदूषण विरहित पर्यावरणासाठी पुनर्वापर आणि चिरकाल टिकणारे उपाय या विषयावर महत्वपूर्ण अंतर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस रामदास आठवले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संयुक्त अरब अमीरात सरकारचे पुनर्वापर पुनर्प्रक्रिया विषयाचे सल्लागार महेर अल काबी रीना वीज, विजय बैंस, समिअल्लाह खान, कार्तिक रमण, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते
रामदास आठवले पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्व आघाड्यांवर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून संपूर्ण जगातून भारतात उद्योग व्यवसाय विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे. भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संयुक्त अरब अमीरात युएई आणि भारताने संयुक्तपणे प्रयत्न करून दोन्ही देशांत व्यापार उद्योग वाढविण्याचे आवाहन यावेळी केले.
संयुक्त अरब अमीरातचे राजे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. संयुक्त अरब अमिराती मध्ये विशेषतः दुबईत मोठ्या प्रमाणत भारतीय व्यापार आणि वास्तव्य करीत आहेत. त्यांना कोणताही त्रास नाही त्यांना यूएई सरकारचे चांगले सहकार्य मिळत असते त्याबद्दल यूएईचे राजे यांचे भारतीयांच्या वतीने रामदास आठवले यांनी आभार मानले.
भारताची राजधानी दिल्ली आहे आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे, तसेच संयुक्त अरब अमीरातची राजधानी अबुधाबी आहे आणि आर्थिक राजधानी दुबई आहे. संयुक्त अरब अमीरात आणि भारत या दोन्ही देशांनी मिळून पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देऊ; व्यापार उद्योग वाढवू तसेच जागतिक पर्यावरण संरक्षण साठी प्रयत्न करूया. भारतात मोदी सरकार च्या नेतृत्वात सौर ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर होत आहे. प्लास्टिक मुक्त शहरे करण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू आहेत त्यादृष्टीने जगात सर्वच देशांनी पर्यावरण रक्षणाचा संवर्धनाचा विचार करावा असे आवाहन रामदास आठवलेंनी यावेळी केले. या परिषदेस भारतातून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि तोसिफ पाशा बेंगलोर आणि जावेद अहमद दिल्ली हे उपस्थित होते.