साधारणतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला दोन वर्षे दोन महिने पूर्ण झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टींबाबत निर्णय घेतला. मात्र केंद्रातील सरकारच्या धर्तीवर आश्वासक अनेक गोष्टींच्या घोषणा करायच्या परंतु निर्णय एकही घ्यायचा नाही अशा पध्दतीने कारभार केला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने आधी जाहिर केलेली योजनेच्या धर्ती महाराष्ट्रातही लाडकी बहिण योजना जाहिर करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने महायुती सरकारला पडत आहेत. तर दुसऱ्याबाजूला सत्ताधारी पक्षातील आमदारच आता लाभार्थी किंवा मतदारांना धमकाविण्याचे प्रकार सुरु झाले. या धमकाविण्याचे पडसाद आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याची माहिती पुढे आली आहे.
लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी भाजपाचे आमदार रवि राणा यांनी, एका कार्यक्रमात बोलताना सध्याचे सरकार हे जनतेसाठी चांगल्या योजना जाहिर करत आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या प्रत्येक महिलेला १५०० रूपये मिळणार आहेत. त्यामुळे या सरकारला येणाऱ्या निवडणूकीत भरभरून आर्शिवाद आपण सर्वांनी द्यायला हवे. हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेवर आल्यानंतर त्यात वाढ करून ३००० रूपये देण्याची मागणी करून ती मिळवून देऊ. जर या सरकारला भरभरून आर्शिवाद दिले नाहीत तर दिलेले १५०० रूपये मी काढून घेणार असल्याचा दमही उपस्थित महिला लाभार्थ्यांना नुकताच दिला.
तर दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार महेश शिंदे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना लाभार्थ्यांना १५०० रूपये मिळाल्यानंतर पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले पाहिजे, अन्यथा पैसे घेऊन मतदान न करणाऱ्यांचे पैसे काढून घेऊ, तसेच कोण सरकारच्या विरोधात मतदान करणार, कोण बाजूने आहे याची सगळी माहिती आपणाकडे असून निवडणूकीनंतर त्यांच्याकडे बघू असा गर्भित इशाराही यावेळी दिला.
या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले, त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांच्या मार्फत समज दिली की, लाडकी बहिण योजनेच्याबाबत बोलताना मंत्री, आमदार यांनी नीट विचार करून बोलावे अशी सूचना करत आमदार, मंत्र्यांच्या वक्तव्याचा फायदा विरोधकांना होत असल्याने बोलताना विचार करून बोला असेही यावेळी सांगितले.