नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले. तसेच त्यादिवशी नौदलाचे संचलनही झाले. या पुतळा अनावरणास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला नाही तोच हा पुतळा कोसळून पडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुतळा नेमका कशामुळे कोसळला याचे नेमके कारण करू शकले नाही.
हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ब्रिटीश आणि पोर्तीगीजांच्या नौदलाशी तुल्यबळ अशा भारतातील पहिल्य़ा नौदलाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती. त्यामुळे भारतीय नौदलाचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आजही घेतले जाते. तसेच भारतीय नौदलात शिवाजी महाराजांचे नाव गुरु म्हणून घेतले जाते. या सर्व ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज यांनी समुद्रात बांधलेल्या जलदुर्ग-अर्थात सिंधूदुर्ग किल्याच्या किनारी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. मात्र या पुतळ्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या कोसळण्यामागील नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राज्य सरकारने उभारलेल्या या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून एक वर्षे झाले नाही तोच हा पुतळा कोसळल्याने या घटनेची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या नव्या संसद भवन इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ऐन पावसाळ्यात नव्या संसद भवनात पाण्याची गळती सुरु झाली. तसेच मोठ्या वाजत-गाजत अयोध्येतील राम मंदीराचे उद्धघाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर त्या राम मंदीरतही पावसाळ्यात पावसाचे पाणी गळायला लागल्याची चर्चा सुरु झाली. आता मालवणच्या समुद्रा किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले. तर आता हा पुतळाच कोसळून पडला. त्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.