हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता निवडणुका घ्या चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, जुमला ठरू नये.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणताही विलंब न करता व कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घेऊन नगरसेवक, महापौर, सभापती पदांचे पूर्ववैभव आणावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था लागू केली गेली व सत्तेचे विकेंद्रीकरण केले. यातून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, सभापती अशी सत्तेची विभागणी झाली पण मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकाच घेतल्या नाहीत. केंद्रात मोदीशाह व राज्यात फडणवीस यांना सत्ता आपल्याच हाती हवी होती या आग्रही भूमिकेमुळे या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. आता सर्वोच्च न्यायालयानेच निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने आतातरी निवडणुका घेऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करावे असेही यावेळी सांगितले.

चौंडी मंत्रिमंडळ बैठक..

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून चौंडी गावी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा करण्यात आली. पण राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता ह्या योजनांसाठी सरकार पैसा कोठून आणणार हा प्रश्न आहे. सरकारकडे लाडकी बहिण योजनेला निधी नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग केला. मागील महिन्यात एसटी कामगारांना पगार देण्यास पैसे नव्हते. शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत तर या घोषणांची अंमलबजावणी कशी करणार. निवडणुकी आधी अशाच मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या पण आता त्याची अंमलबजावणी केली जात नाही. २०१४ च्या निवडणुकी आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन बारामतीतील एका कार्यक्रमात दिले होते, त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. आता चौंडी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणा सुद्धा आधीच्या घोषणांप्रमाणे जुमले ठरू नयेत अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

पहलगाम हल्ला..

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलागाम अतिरेकी हल्ल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचे गुप्तचर विभागाला संकेत मिळाले होते तरीही सरकारकडून काही हालचाली झाल्या नाहीत असे मल्लिकार्जून खर्गे म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य असू शकते, खर्गे यांना ५० वर्षांचा राजकीय अनुभव आहे ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत पहलगाव प्रश्नी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला सर्वांचा पाठिंबा आहे. अशा प्रसंगी देश एकजूट आहे हाच संदेश गेला पाहिजे, पण हल्ल्याच्या १० दिवसानंतरही सरकारकडून ठोस भूमिका घेतलेली नाही अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *