जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती

राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे.

जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून तर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतीचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकले आहेत, तर काही लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

पुढे जयंत पाटील पत्रात म्हणाले की, मी मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांवर मोठा बिकट काळ ओढावला आहे. पूराच्या पाण्यामुळे फक्त पिकं नष्ट झाली असे नाही तर शेतकऱ्यांची जमीनही खरडून वाहून गेली आहे. नुकसान इतके झाले आहे की शेतकरी वर्षभर राबला तरी परिस्थिती स्थिरस्थावर होणार नाही असे दिसते अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

शेवटी पत्रात जयंत पाटील म्हणाले की, अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. पण सरकार असे करताना दिसत नाही. महोदय, हे काही योग्य नाही. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी व तात्काळ निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी विनंती करीत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *