बडोले, सवरा,महेतांची कामगिरी खराब म्हणून नाही काढले दलित, आदीवासी मंत्र्यांच्या गच्छंतीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव

मुंबईः प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना १३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करतानाच विद्यमान ३ मंत्री ३ राज्यमंत्र्यांची गच्छंती करण्यात आली. परंतु राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश महेता, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रविण पोटे-पाटील आणि अम्बरीष आत्राम यांची कामगिरी खराब असल्याने काढले नाही. तर त्यांची कामगिरी चांगलीच असून ती आणखी चांगली व्हावी आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असल्याने त्यांना वगळल्याची सारवासारव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना लोकायुक्तांनी दोषी ठरविले असे म्हणता येणार नाही. मात्र लोकायुक्तांनी दिलेला निकाल त्याचा एटीआर आवाहालासह विधिमंडळात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी नेहमीच पुराव्याशिवाय अनेक मंत्र्यांवर आरोप केले. त्या त्यावेळी त्यांननी विधिमंडळात हंगामा, गोंधळ घातला. परंतु आम्ही संवेदनशीलतेने आरोप होणाऱ्या मंत्र्यांची चौकशी लावली. तरीही विरोधकांकडून चौकशी लावली तर क्लीन चीट दिल्याचा आरोप करतात असा टोलाही त्यांनी लगावला.
विरोधकांची लोकांशी नाळ तुटली असल्यानेच त्यांची अशी अवस्था झाल्याचे सांगत विखे-पाटील यांनी विरोधी पक्षात असताना भाजप मंत्र्यांवर केलेले आरोप मागे घेतल्याचे स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे विजयी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विजयात रणजीतसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे वडील विजयसिंह यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांचा योग्य तो सन्मान राखला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीला चार-सहा महिने राहीले असताना मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता कशाला असा प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले की, पुढेही आमचेच सरकार येणार असून नवी टीमसोबत चांगली कामगिरी करायची आहे. तसेच नवा डाव नवे खेळाडू अशी रणनीती आहे.
काँग्रेसच्या नेत्यांचा त्यांच्याच पक्षनेतृत्वावर विश्वास नाही. त्यामुळे त्यांची माणसे त्यांना सांभाळता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
यंदा सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प अधिवेशनात मांडणार असून धनगर समाजाच्याबाबत जी काही आश्वासने दिली. ती पूर्ण करणार असल्याचे सांगत यंदाच्या अधिवेशनात २८ विधेयके मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *