मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विविध बोर्डाच्या अर्थात एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असून तशी कायद्यात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
२४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी जाहीर केले.
दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाबत सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणाही त्यांनी केली.
Marathi e-Batmya