भरत गोगावले यांचे आवाहन, रोहयो विभागामार्फत भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहा सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरतीच्या जाहिराती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य नागरिक व बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भरत गोगावले पुढे म्हणाले की, ‘रोजगार हमी योजना विभागांतर्गत महाराष्ट्रात तात्काळ भरती! स्थिर नोकरीची आकर्षक संधी!’ अशा आशयाची जाहिरात व्हॉट्सॲपद्वारे राज्यभर व्हायरल करण्यात आली आहे. या जाहिरातीत कार्यक्रम तांत्रिक अधिकारी (PTO), सहायक कार्यक्रम अधिकारी (APO) आणि क्लार्क कम डेस्क ऑफिसर (CDO) पदांसाठी भरती सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर जाहिरातीत नोंदणीसाठी १ हजार ५०० रुपये शुल्क भरण्याची अट घालण्यात आली असून, ५८ वर्षांच्या कराराधारित नियुक्तीचे आमिष दाखविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे की, अशी कोणतीही भरती प्रक्रिया शासनामार्फत सुरू नसून संबंधित जाहिरात पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. शासनाकडून थेट भरतीसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असून या बोगस जाहिरातीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याने संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत विभागामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

About Editor

Check Also

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवला मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अ-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *