राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास विद्यापीठांनी जगासाठी योग प्रशिक्षक घडविण्याचे, राज्यपालांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यावर्षी लोकभवनातील योग दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल यंदा स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

योगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र लोकभवनातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार – प्रसार करण्याचे तसेच जगासाठी उत्तम योग शिक्षक व प्रशिक्षक घडवण्याचे आवाहन केले.

आज योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, शतकानुशतके योगाचा अभ्यास केवळ घरांमध्ये, आश्रम आणि योग संस्थांमध्ये केला जात असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन केल्यानंतर आज जगातील १५० हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

सन १९७७ झालेल्या स्थापनेपासून राष्ट्रसेवेत कार्यरत असलेल्या व यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या योगदानाचे राज्यपालांनी कौतुक केले.

असंख्य यशस्वी मोहिमा आणि दक्षतेमुळे भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, गजबजलेली बंदरे आणि महत्त्वपूर्ण सागरी हितसंबंध असलेल्या महाराष्ट्राला तटरक्षक दलाच्या कार्याचा मोठा लाभ झाला आहे. समुद्रातील जीविताचे संरक्षण, मच्छीमार आणि नाविकांची सुरक्षा, बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध आणि किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी तटरक्षक दलाने प्रभावीपणे पार पाडली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

तटरक्षक दलाचे अधिकारी आणि जवान कठीण परिस्थितीतही अथक परिश्रम करून भारताचे समुद्र सुरक्षित, संरक्षित आणि समृद्ध ठेवत असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

आपण राज्यातील २९ विद्यापीठांचे कुलपती आहोत याचा उल्लेख करुन राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावे व योग या भारताच्या अमूल्य परंपरेचा जागतिक प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे अतिरिक्त महासंचालक एम. व्ही. पाठक, पीटीएम, टीएम तसेच महानिरीक्षक भीष्म शर्मा, पीटीएम, टीएम यांनी राज्यपालांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग व प्राणायाम सत्राचे मार्गदर्शन केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *