मुंबईः प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदीर उभारणीच्या अनुषंगाने कथित वक्तव्यांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा थेट नामोल्लेख न करता बयान बहादूर आणि बडबोले अशी उपरोधिक टीका केली. या टीकेची दखल घेत उध्दव ठाकरे यांनी तातडीने मी हिंदू समाजाच्या भावना समोर ठेवल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. अयोध्येत रामाचे मंदीर लवकर व्हावे अशी इच्छा आहे. त्यामुळेच यासंदर्भातील वक्तव्य आपण केल्याचा खुलासा त्यांनी केला.
राम मंदीराच्या प्रश्नावरून शिवसेनेने सातत्याने विशेषतः शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, स्वतः उध्दव ठाकरे यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रश्नावरून भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास पंतप्रधान मोदी यांनी महाजनादेश यात्रेच्या महासमारोप करताना चांगलेच उत्तर देत शिवसेनेला गप्प केले.
भाजपा-शिवसेनेत ५०-५० चा फॉर्म्युला ठरलेला
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेनेची युती राहणार आहे. तसेच या निवडणूकीत ५०-५० चा फॉर्म्युला ठरलेला आहे. लोकसभा निवडणूकीच्या आधी भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढील दोन दिवसात युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya