तक्रारकर्ती महिला आणि याचिकाकर्ता दोघेही परस्परसंमतीने नातेसंबंधात होते. परंतु, त्यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर आणि नात्यात दुरावा आला आणि त्यानंतर तक्रारदार महिलेने याचिकाकर्त्याविरोधात बलात्कार व धमकीची तक्रार नोंदवली. याचिकाकर्त्यानेही या तक्रारीला प्रत्युत्तर म्हणून तक्रारदार महिलेविरोधात फौजदारी तक्रार नोंदवली. परंतु, याचिकाकर्त्याविरोधातील फौजदारी प्रक्रिया सुरू राहिल्यास किंवा ती सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यास तो त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरण्याची शक्यता नाही. तसेच, याचिकाकर्त्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू राहणे हे कायद्याच्या प्रक्रियेचाही गैरवापर असल्याचे न्या.भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाविरोधातील गुन्हा रद्द करताना अधोरेखीत केले.
याचिकाकर्ता वकील आणि तक्रारदार हे एकमेकांना शाळेपासून ओळखत होते. लग्नानंतर तक्रारदार पतीसह परदेशी स्थायिक झाली. परंतु, त्याच्याशी मतभेद झाल्यानंतर ती मुलाला घेऊन भारतात परतली. तथापि, जानेवारी २०२० मध्ये ते पुन्हा संपर्कात आले. पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तिने याचिकाकर्त्याला संपर्क साधला. पुढे, दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. परंतु, याचिकाकर्त्याने आपल्या भावनिक स्थितीचा फायदा घेऊन आपल्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. याउलट, हे संबंध परस्परसहमतीने होते आणि तक्रारदार ही आईवडिलांच्या परवानगीने आपल्यासह राहत होती. कोणतीही तक्रार किंवा प्रतिकाराशिवाय ती आपल्यासह नातेसंबंधात होती, असे प्रत्यूत्तर याचिकाकर्त्याने दिले.
याचिकाकर्ता विवाहित असतानाही तक्रारदार महिला त्याच्यासह नातेसंबंधात होती. ती स्वेच्छेने आणि आईवडिलांच्या परवानगीने त्याच्यासह होती. शिवाय, नातेसंबंध बिघडल्याने तक्रारदार महिलेने याचिकाकर्त्याविरोधात तक्रार केलेली नाही, तर आर्थिक व्यवहारांमुळेही याचिकाकर्ता आणि तक्रारदार महिलेत दुरावा निर्माण झाल्याचे प्राथमिक माहिती अहवालातून स्पष्ट होते. तसेच, या सगळ्या बाबींचा विचार करून याचिकाकर्त्याविरोधातील गुन्हा रद्द करणे योग्य असल्याचे खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिलासा देताना नमूद केले.
Marathi e-Batmya