आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारी अर्ज कसे भरावेत, याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी सुचना उच्च न्यायलयाने केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) निवडणुकीचे नामांकन अर्ज कसे भरायचे याबद्दल इच्छूक उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे, अर्ज कसा भरावा, त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबद्दलचे व्हिडिओ ट्यूटोरियल तयार करावे, अशी सुचनाही न्या. आरिफ डॉक्टर आणि न्या. सोमशेखर सुंदरसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने केली. तसेच राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या पाच इच्छूक उमेदवारांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
याचिकांमध्ये केलेल्या मागणीचा विचार करून नामनिर्देशन अर्ज नाकारण्याचा निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसरचा (आरओ) निर्णय चुकीचा असल्याचे गृहीत धरले तरी, या टप्प्यावर असे कोणताही आदेश निवडणुकीच्या वेळापत्रकात व्यत्यय आणणारा ठरेल आणि निवडणूकीचे वेळापत्रक विस्कळीत होईल. प्रत्येक ईव्हीएम मशीन त्या-त्या मतदारसंघातील मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी शिल्लक १४ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे असे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना अधोरेखीत केले. तसेच आरओला इच्छूक उमेदवारांचा अर्ज फेटाळण्याचे अधिकार दिला जाऊ नये, यावर उपाय म्हणून आरओला अर्जाचा पुनर्विचार करण्यास सांगण्याचे आदेश दिले. तर निवडणूक घेणे कठीण होईल, असेही खंडपीठाने नमूद केले. तसेच निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसरच्या (आरओ) निर्णयाला रीट याचिकेतून नव्हे, केवळ निवडणूक याचिकेद्वारे आव्हान दिले जाऊ शकते, या उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देऊन खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या याचिका फेटाळून लावल्या.
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास मुंबई, ठाणे, शहापूरातीव दोन, आणि चिपळूणातून एका अशा इच्छुक उमेदवारांचे निवडणूक अर्ज स्वीकारण्यास निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसरने (आरओ) नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर पाचही इच्छूक उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Marathi e-Batmya