उदय सामंत यांची माहिती, बीएमसी क्षेत्रात एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची विकास कामे सुरू शासनाकडील देय रक्कम महापालिकेस टप्प्याटप्प्याने देणार

मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असून मुंबई महापालिकेस शासनाकडून देय असलेली देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे  उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य सुनिल शिंदे यांनी या विषयी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत ॲड. अनिल परब, जगन्नाथ अभ्यंकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, मुंबईत पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून यामध्ये कोस्टल रोड, शहरातील पूल, रस्ते व नद्यांचे पुनरुज्जीवन, मिठी नदी सुधारणा,  एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प, स्ट्राँग वॉटर ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यासारखे महत्त्वाचे प्रकल्प मुंबई शहरात सुरू असल्याचे सांगितले.

मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेल्या निधीबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. मुंबई महापालिकेस आरटीई अंतर्गत देय असलेला ८६ कोटी रुपयांचा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. तसेच विविध विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेला १० हजार ९३१ कोटी रुपयांचा निधी टप्याटप्याने दिला जाईल, असेही सांगितले.

मुंबई महापालिकेचे आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगत, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, महापालिकेचे काही भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यातून महापलिकेला अधिकचा  महसूल  मिळणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *