मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास विकास आघाडीच्या सरकारला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही. तोच या सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याची टीका भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून भाजपाच्या अन्य नेत्यांनीही हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे भाकित केले.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा ही पतनाची सुरुवात असून आमच्यामुळे निवडून आले आणि सत्तेसाठी दुसऱ्या पक्षासोबत गेले. मंत्रीमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप झाले नाही. मलाईदार खात्यासाठी लढाई सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.
तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिवसभरात अशा बऱ्याच बातम्या मिळतील, असं सूचक वक्तव्य केलं.
तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सत्तेच्या खुर्चीचा खेळ सुरु आहे. सध्याच्या सरकारमध्ये रोज राजीनामास्त्र वापरलं जातं असे खोचकपणे सांगत जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी, सत्तेसाठी काहीही निर्णय घेत सरकार स्थापन केलं तेथे असंच होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा हा महाविकास आघाडीला पहिला झटका असून असे अनेक झटके यापुढे या सरकारला सहन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना-काँग्रेसचे अनेक मंत्री आणि आमदार नाराज असून अब्दुल सत्तारांप्रमाणे ते मंत्री, आमदार राजीनामा देतील आणि हे सरकार पडेल, असा दावाही त्यांनी केला.
Marathi e-Batmya