राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, बाळासाहेबांचे ऐकणार की, शरद पवारांचे ? पत्र लिहित हिंदू आपली ताकद काय ते राज्य सरकारला दाखवून देण्याचे आवाहन

औरंगाबादेतील सभेप्रकरणी पोलिसांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मनसैनिकांना आपल्यापुढील ध्येय धोरणाची जाणीव होण्यासाठी राज ठाकरे यांनी थेट हिंदूधर्मियांना मस्जिदीसमोरील भोंग्याच्याविरोधात मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवावी असे आवाहन करत त्यातून आपली ताकद दाखवून द्या असे सांगत भोंग्याप्रश्नी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकणार की, ज्यांनी सत्तेवर बसविलेल्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेबांचे ऐकणार असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला.

भोंग्याचा विषय हा सामाजिक आहे. याचा त्रास जसा वयोवृध्द नागरीक, लहान मुले, रूग्ण, अशक्त व्यक्ती, विद्यार्थी यांना होतो तसा तो हिंदूबरोबरच मुस्लिम धर्मियांनाही होतो. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यत कोणालाही भोंगा लावता येणार नाही. प्रत्येक धर्मियांना त्यांच्या सणाच्या कालावधी पुरता ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी मिळेल. परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनीक्षेपकांसाठी दररोज परवानगी घ्यावी लागेल याची माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली.

ध्वनिक्षेपक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घातली असून कमीत कमी १० डेसिंबल म्हणजे घरात कुजबुजतो तितकी आणि जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे घरातल्या मिक्सरचा आवाज इतका ध्वनीक्षेपक लावता येवू शकतो. सर्वच मस्जिदी अनिधिकृत असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी करत ते पुढे म्हणाले की, हे सरकार अनधिकृत मस्जिदीवरील भोंग्याना अधिकृत परवानग्या का देत आणि कशी देते आहे ? असा सवाल करत जर परवानगी द्यायची असेल तर आमच्या देवळांनाही द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मियांना ध्वनिक्षेपकांचा त्रास होतो.  ही बाब देशातल्या प्रत्येक नागरीकाला समजली पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणे, वाहतुक कोंडी करणे हे कोणत्या धर्मात बसतं? असा सवाल करत या विषयाला धार्मिक वळण दिलं तर आमच्याकडून धार्मिकच उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्यामुळे देशातल्या तमाम हिंदू बांधवांना ४ मे रोजी जिथे जिथे भोंगे अजाण, बांग देतील तिथे तिथे आपण भोंग्यावर हनुमान चालिसा लावावी असे आवाहन करत भोंग्याचा त्रास काय असतो हे त्यांनाही समजू दे असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर ज्या मस्जिदींनी सामाजिक भान बाळगून भोंगे उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या मस्जिदींशी संबधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे स्वागत करतो. तसंच जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मस्जिदींच्या परिसरातील कोणताही त्रास होणार नाही याची हिंदब बांधवांनीही काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षापूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेले ऐकणार आहात की, तुम्हाला सत्तेवर बसविणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात ? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे असा इशारा देत देशात इतकी कारागृह नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल हे सुध्दा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे अशी आठवण करून देत भोंगे हटविण्यासाठी पक्षाची बंधने झुगारून हिंदू बांधवानो एकत्र या असे आवाहनही त्यांनी यापत्राद्वारे केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *