प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे धाव विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये मूळ उत्तर प्रदेशचा नागरिक असलेल्या उस्मानीने हिंदू समाजाच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विखारी वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

शरजिल उस्मानी हा उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील सिधारी या गावातील मूळ नागरिक आहे. हिंदू समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य करणा-या उस्मानीच्या विरोधात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. पण आज पाच दिवस झाले तरी त्याच्याविरोधात कुठलीच कारवाई महाराष्ट्रातील सरकारने केली नाही. तसेच यापुढेही त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल अशी खात्री सध्या वाटत नाही. त्यामुळे हिंदू विरोधात वक्तव्य करणा-या उस्मानीच्या विरोधात आपल्या सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात कुठलीही व्यक्ती कोणताही समाज वा धर्माच्या विरोधात अश्या प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करण्याचे धाडस करणार नसल्याची बाब त्यांनी  मुख्यमंत्री योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे हा शरजिल उस्मानी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. पुणे येथील एल्गार परिषदेत त्याने त्याच्या भाषणात केलेले वक्तव्य हे समाजा-समाजामध्ये दुही माजविण्यासाठी कारणीभूत ठरेल अश्या प्रक्षोभक स्वरुपाचे आहे. त्याचे वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या संविधानिक संस्थाच्या विरोधातील असून हा एका अर्थाने देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे उस्मानीच्या विरुध्द तात्काळ एफआयर दाखल करुन त्याला अटक करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *