पुन्हा आलेले देवेंद्र सरकार ३० तारखेला बहुमत सिध्द करणार राज्यपालांनी दिली सात दिवसांची मुदत

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीदरम्यान मी पुन्हा येईनची घोषणा देणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली घोषणा खरी करून दाखवित आज नाट्यमय पध्दतीने राजकिय हालचाली करत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या नव्या देवेंद्र सरकारला राज्यपालांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची आपले बहुमत सिध्द करण्याची मुदत दिली.
राज्यात भाजपातेर शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याची अटकळ सर्वांनीच बांधली होती. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून नाट्यमय घडामोडींनी सुरुवात होत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे भाजपाच्या वळचणीला गेले. तसेच त्यांनी पाठिंब्याची कागदपत्रे सादर करत भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे राज्यपालांसमोर स्पष्ट केले.
या सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी ७ दिवसांची अर्थात ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली. मात्र अजित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार नसल्याचे चित्र सध्यातरी शरद पवार यांच्या पुढाकाराने स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांनी शपथविधीला बोलाविलेल्या १० ते १२ आमदारांपैकी ७ आमदारांनी अजित पवारांऐवजी शरद पवारांसोबत जाण्याचे जाहीर केल्याने भाजपाच्या देवेंद्र सरकारच्या मागे उभे राहणारे संख्याबळ कमी होणार असल्याचे दिसून येत आहे.
तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार विधानसभेत बहुमत सिध्द करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *