भाजपा-सेनेतील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात, पण मुख्यमंत्र्यांमुळे नावे जाहीर करणार नाही दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात

नागपुर: प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्षातील अनेक लोक शिवसेना आणि भाजपात जात आहेत. परंतु सेना – भाजपात गेली तीन – चार वर्षे निवडणूक लढवण्याकरीता काम करणारे लोक दुखावले आहेत. अशी दुखावलेली मंडळी माझ्या संपर्कात असून त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण मुख्यमंत्री साम-दाम-दंड भेदाचे सूत्र वापरण्यात माहीर असल्याने त्यांची योग्य वेळी नावे जाहीर करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माहिती दिली.
शिवस्वराज्य यात्रेतील तिसरा टप्पा विदर्भात असून आज नागपुरात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दिक्षाभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
पुरोगामी विचारांचा आदर्श ठेवून शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही राज्य करु असे आश्वासनही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
आज दिक्षाभूमीतून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील सर्व वंचित घटकांना राष्ट्रवादी व काँग्रेससोबत येण्याची प्रेरणा मिळू दे असे विचार संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर करत वंचित समाजासाठीच काम करु. त्यात वंचित घटकांना समान उत्तम न्याय देवू असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या समवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांची माहिती, पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना ई-रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *