एस. चोकलिंगम यांची माहिती, मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षण

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे विशेष सखोल मतदार पुनरिक्षण करण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयातील मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम पुढे म्हणाले की, या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. घराघरात भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्म द्वारे मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लीकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे. २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही स्पष्ट करत एकूण दोन ते तीन वेळा बीएलओ मतदाराच्या घरी माहिती जमा करण्यासाठी जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

एस चोकलिंगम यांनी सांगितले की, मोहीमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून २० ते २९ जूनदरम्यान गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील.५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, तर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. ७ ऑक्टोबर २०२६ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पुढे बोलताना एस चोकलिंगम म्हणाले की, राज्यातील सुमारे १ लाख २५३ हजार बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट्स या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकरीत्या वगळले जाणार नाही, अशी ग्वाहीही यावेळी दिली.

तसेच एस चोकलिंगम म्हणाले की, निवडणूकीच्या बुथ मॅपिंग झालेले असेल आणि मतदाराचे नाव त्यात आढळून आले असेल तर मतदाराला त्यांची कोणतीही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्या मतदाराचे नाव यादीत नसेल तर त्याने सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या 12 कागदपत्रांपैकी एक पुरावा मतदान नोंदणीचा अर्ज भरताना जोडावा लागेल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

सहाय्यक गट विकास अधिकारी आणि उपलेखापाल पदांसाठी २५ मे पासून विभागीय परिक्षा महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदासाठी परिक्षा

महाराष्ट्र विकास सेवा अंतर्गत सहाय्यक गट विकास अधिकारी (गट-ब) या पदावर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *